राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीत धान्य पिक स्पर्धा रब्बी हंगाम- 2024 साठी 31 डिसेंबर पर्यंत करता येणार अर्ज

जामनेर(प्रतिनिधी)राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढवून आणखी उमेदीने नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे कृषी उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, या उद्देशाने दरवर्षी राज्यांतर्गत‌ पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते.यावर्षी देखील कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या पाच पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पीक स्पर्धेसाठी रब्बी पिके ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस अशा एकूण पाच पिकांचा समावेश असणार आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे तसेच ती जमीन स्वतः कसत असणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकासाठी अर्ज करता येणार आहे. पिक स्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक असणार आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र अ), ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७/१२, ८- अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास), पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारा वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा देखील आवश्यक आहे. 31 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे. सर्वसाधारण गटासाठी पीकनिहाय (प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र) रक्कम रुपये 300 तर व आदिवासी गटासाठी पीक निहाय रक्कम रुपये 150 राहील. तालुकास्तर, जिल्हास्तर, व राज्यस्तरावरील पीक स्पर्धा निकाल प्रथम, द्वितीय, व तृतीय क्रमांकाचे पिक स्पर्धा विजेते निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षीसाचे स्वरुप हे पातळीनुसार असणार आहे. ज्यात तालुका पातळीवरील पहिले बक्षीस पाच हजार रुपये, दुसरे बक्षीस तीन हजार रुपये, तिसरे बक्षीस दोन हजार रुपये असणार आहे. तर जिल्हा पातळीवरील पहिले बक्षीस हे दहा हजार रुपये, दुसरे बक्षीस सात हजार रुपये, तिसरे बक्षीस पाच हजार रुपये आहे. राज्य पातळीवरील पहिले बक्षीस पन्नास हजार रुपये, दुसरे बक्षीस चाळीस हजार रुपये, तिसरे बक्षीस तीस हजार रुपये असणार आहे. पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जामनेर श्री. जितेंद्र पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *